गुलजारसाहेबांचं नाव आधीही ऐकलं होतं. पण मुळातच राज कपुर आवडता असल्याने आम्हाला शैलेंद्रचं वेड. तसे थोड्या फार प्रमाणात मजरुह, साहिरही आवडायचे. थोड्याफार प्रमाणात एवढ्यासाठी की त्यावेळी गाणं आवडायचं, पण ते कुणी लिहीलय हे शोधण्याकडे फारसा कल नसायचा. आमच्यासाठी त्याचा गायकच देव किंवा दिलीपकुमार असायचा. तर माया मेमसाबमधील ते गाणे ऐकलं…
खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांवमें चल रही हूं…
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
मै सहमी रहती हूं नींदमें भी
कही कोई ख्वाब डस न जाये…..
मेरे सरहाने जलावो सपने
मुझे जरासी तो नींद आये….
थँक्स टू गुलजारसाहेब ! थँक्स टू केतन मेहता, थँक्स टू माया मेमसाब . त्यादिवशी जर माया मेमसाब बघायला म्हणून गेलो नसतो तर कदाचित आहे तसंच रुटीन चालु राहीलं असतं. गायक आणि संगीतकार यांचेच गोडवे गाण्यात आयुष्य गेलं असतं. त्या गाण्याने आधी गुलजारसाहेबांचा शोध सुरु झाला. जस-जसे गुलजार साहेब आवडायला लागले तस-तसे इतर गीतकारांचीही माहिती मिळवणं सुरु झालं आणि शैलेंद्रच्या पलिकडेही एक खुप मोठं जग आहे हे लक्षात आलं. जसजसा खोलात जायला लागलो. साहिर, मजरुह वाचनात यायला लागले, तस तसं त्यांच्या प्रेमात पडत गेलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत कविता हा केवळ एक छंद होता. आता त्या छंदाचं रुपांतर व्यसनात झालं. श्रेय जातं गुलजारसाहेबांना ! पुढे कधीतरी २००५-६ च्या दरम्यान ’पुखराज’ हातात आलं….., ते वाचलं आणि गुलजारच्या इतरही कविता शोधायचा नाद लागला. गुलजारसाहेबांचं व्यसन लागलं असं म्हणायला हरकत नाही खरे तर. हळूहळू गुलजार आणि त्यांच्या कविता हा आयुष्याचा एक मूलभूत घटक बनून गेला. सुख असो वा दुःख, आनंद असो वा समाधान गुलझारसाहेब प्रत्येक प्रसंगात सोबत राहायला लागले आणि आयुष्य थोडं सहज आणि सुलभ बनत गेलं.

गुलजारसाहेबांचेच एक गाणे, खरेतर एक अंगाईगीत आज तुमच्यासमोर उलगड़तोय. मासूम हा १९८२ सालचा एक गाजलेला चित्रपट. मी अक्षरशः प्रेमातच पडलो होतो. त्याच्या कथेसाठी, नसिरुद्दीन, शबाना, उर्मिला आणि जुगलच्या अभिनयासाठी आणि त्यातील गीतांसाठी. पण या चित्रपटाचे खरे आकर्षण होते गुलजारसाहेबांचे शब्द आणि पंचमदांचे वेड लावणारे संगीत. यातली सगळीच गाणी गाजली पण त्यातूनहीँ माझं आवडतं, आरती मुखर्जी ह्या बंगाली गायिकेने गायलेलं ‘ दो नैना और एक कहानी’ हे गीत.
दो नैना और एक कहानी
थोड़ा सा बादल थोड़ा सा पानी
और एक कहानी ….

हे गाणं समजून घेण्यासाठी थोडं चित्रपटाचे कथानक जाणून घ्यावे लागेल. दिल्लीत राहणारं एक चौकोनी , सुखी कुटुंब इंदू आणि डीके आणि त्यांच्या दोन गोड लेकी मिन्नी आणि पिंकी. अतिशय सुखाने चाललेले आयुष्य त्यांना एका विचित्र वळणावर घेवून येते जेव्हा डीकेला कळते की त्याला अजुन एक मुलगा आहे. बिझनेसटूरच्या दरम्यान भेटलेली भावना आणि तिच्याशी निर्माण झालेलं नातं. भावनाचा मृत्यु झालेला आहे, पण ती मागे एक डीकेपासुन झालेला एक गोड मुलगा ठेवून गेलेली आहे. राहुल. त्या निरागस लेकराची ही कहाणी, मासूम.
डीके आपली जबाबदारी नाकारत नाही. तो राहुलला आपल्याबरोबर दिल्लीला आपल्या घरी घेवून येतो. इंदुकडे सर्ब प्रकाराची स्पष्ट कबूली देतो. इंदू राहुलला आश्रय नाकारत नाही, पण ती त्त्याला स्वीकारुही शकत नाही. त्या भरलेल्या घरात ते लहानगं पोर पुन्हा एका एकाकी बेटासारखं जगायला लागतं. नाही म्हणायला वडिलांचा जीव आहे त्याच्यावर, पण ते कामानिमित्ताने कायम बाहेर. इथे त्याची सावत्र आई छळही करत नाही त्याचा. पण तिचं त्याच्यापासुन तूटल्यासारखं राहाणंच जास्त त्रासदायक होतेय त्याला.
अश्यातच एका रात्री इंदु छोट्या मिन्नीला झोपवण्यासाठी अंगाई गायला सुरुवात करते. मिन्नीला कडेवर घेवून पायाला चिकटलेल्या पिंकीला सांभाळत ती आर्तपणे अंगाईचे सुर छेड़त जाते आणि कॅमेरा अलगद दाराच्या आड लपुन ते गाणं ऐकणाऱ्या दोन करुण डोळ्यांवर येवून स्थिरावतो. ….
दो नैना… और एक कहानी !
नक्की नाही आठवत आता, पण राहुलबद्दल समजल्यानंतर मानसिकरित्या कोलमडून पडलेली तरीही वरवर अतिशय शांत भासवणारी इंदू. अतिशय धीराने, संयमाने मनातली विचारांची, दुःखाची वादळे सांभाळत ती या सगळ्या प्रसंगाला सामोरे जाते. सगळे वादळ पचावून शांतपणे अगदी यांत्रिकरित्या आपली नित्यकर्मे पार पाडत राहते. डीकेची तर विलक्षण कुचंबणा होत राहते. एकीकडे इंदू आपल्या दोन मुलींवर प्रेमाचा वर्षाव करीत असताना, त्याचाच अंश असलेला राहुल मात्र उपेक्षितासारखा एका कोपऱ्यात राहून आपलं जीवन जगत असतो. त्याच्यासाठी बाबांबरोबर असणें, राहायला मिळणे हेच खुप मोठे आहे. पिंकी आणि मिन्नीची आई आपल्याला कधी स्वीकारेल का? या विचारात तो जगतोय. पण प्रत्येक दिवसानंतर येणारी रात्र, ती रात्र खुप त्रासदायक आहे, असते.
छोटी सी दो, झीलों में वो,
बहती रहती है
कोई सुने या ना सुने,
कहती रहती है
कुछ लिख के और कुछ ज़ुबानी
राहुलने दिवसभर वागवलेला शांतपणाचा, धीराचा मुखवटा रात्र झाली की गळून पडायला सुरुवात होते. तश्यात जेव्हा इंदु आपल्या लेकीसाठी अंगाई गायला सुरुवात करते तेव्हा त्याचा आईच्या विरहाचा कढ़ अनावर होतो. पण हे लेकरु कोसळलेल्या संकटामुळे अकाली गंभीर आणि शहाणे झालेले आहे. आपली वेदना पचवुन, लपवून राहुल जगत राहतो. इंदुचे गाणे ऐकून तो आपल्या अभ्यासिकेतून बाहेर येतो. गाणे अर्थातच त्याच्या मनात त्याच्या आईच्या आठवणी जागृत करते. गीत गातेय खरी इंदु , पण तिच्या मनातलं वादळ जुगलच्या मनातील विचाराच्या वादळाशी अधिक मिळतंजुळतं आहे.
“छोटी सी दो झीलों में वो, बहती रहती है “
हे दुःख, ती वेदना त्या दोघांचेही प्राक्तन आहे. जी कुचंबणा, प्रतारणेचे जे दुःख इंदुच्या वाट्याला आलेय. काहीसे त्याच पातळीचे दुःख राहुलसुध्दा अनुभवतोय. इंदुला पतीकडून झालेल्या विश्वासघाताचे दुःख आहे तर राहुलला आईच्या विरहाचे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे नव्या कुटुंबात आपल्याला स्वीकारले गेलेले नाहीये ही भावना त्याला जास्त त्रासदायक आहे. त्यातूनही एकदा धाडस करून तो इंदुला विचारतो सुद्धा, “आन्टी, मैं भी आपको मम्मी कहूँ?” त्यावर इंदु वरवर अतिशय कोरडेपणाने “मैं तुम्हारी मम्मी नही हूँ!” असें कठोर उत्तर देते खरी. पण त्यावर राहुलच्या निष्पाप डोळ्यात साकळलेली वेदना पाहुम ती सुद्धा आतून हललेली आहे. पतीच्या चुकीचा राग आपण त्या निष्पाप, निरागस लेकरावर काढतोय हे तिला आतवर कुठेतरी जाणवतेय. मुळात ती वाईट नाहीच्चे किंवा तिच्या मनात राहुलबद्दलही कसला राग नाहीये. असलाच तर फक्त सवतीचं पोर म्हणून एक दुरावा. पण तिथेही राहुलच्या आईचा मृत्यु झालेला असल्याने या दुराव्याला सुद्धा एक प्रकारची करुणेची, सहानुभूतीची झालर आहेच. काही गोष्टी स्पष्टपणे तर काही अप्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यावर नकळत मोठ्ठा परिणाम करून जात असतात. आणि त्यांचा सगळ्यांच्याच आयुष्यावर कळतनकळत परिणाम होत राहतो. डीके, इंदु, राहुल ही अशीच नियतीच्या सारीपाटाच्या पटावरची प्यादी आहेत.
थोड़ी सी है जानी हुई
थोड़ी सी नयी
जहाँ रुके आँसू वहीं
पूरी हो गयी
है तो नयी फिर भी है पुरानी
आयुष्याची ही विलक्षण कहाणी आपल्या स्वाभाविक वेगाने पुढें सरकत राहते. सरकता सरकता जे कोणी तिच्या कक्षेत येईल त्याला गुरफटून घेत पुढें सरकत राहते. डीके असो, इंदु असो, वा भावना असो किंवा राहुल असो किवा लहानग्या पिंकी आणि मिन्नी असोत. प्रत्येकासाठी आयुष्य, हे जीवन घडोघडी वेगवेगळी रुपे घेवून समोर येत राहते. अगदी ओळखीचं, जवळचं, आपलं वाटणारं आयुष्य अचानक परकं, अज्ञात वाटायला लागतं. जगण्याचे सगळे संदर्भ, सगळी तत्त्वे, सगळे आधार बदलायला लागतात. माणसाची माणसाशी असलेली नाती सदैव बदलत राहतात. म्हणून थोडी ओळखीची तर क्वचित नवीन, अनोळखी सुद्धा. जिथे डोळ्यातली आंसवे थांबतील तिथे एक पूर्णविराम घेवून पुन्हा नव्या वळणावर, नव्या रस्त्यावर नव्याने सुरु होणारी कहाणी.
इक ख़त्म हो तो दूसरी
रात आ जाती है
होठों पे फिर भूली हुई
बात आ जाती है
दो नैनों की है ये कहानी
हो थोड़ा-सा बादल, थोड़ा-सा पानी.
दो नैना और एक कहानी
रात्री या अमर्याद असतात. त्यांची रुपे फक्त बदलत राहतात. अंधाराचे स्वरूप तेवढे बदलत राहते पण तो पूर्णपणे कधीच संपत नाही. या ना त्या रुपात रात्र पुन्हा-पुन्हा समोर येतेच आणि येताना घेवून येते वंचनेच्या, विवंचना, प्रतारणेच्या आणि वेदनेच्या आठवणी. सगळ्या जुन्या आठवणी जणुकाही फेर धरून अवतीभवती नाचायला लागतात. त्यांच्यापासुन कधीच सुटका होत नाही. रात्र आली की पुन्हा त्या जुन्या स्मृतीं, पुन्हा त्या जुन्या गोष्टी डोळ्यासमोर वारंवार उभ्या राहु लागतात. पुन्हा डोळ्यातून साचवून ठेवलेला अश्रुचा ढग फुटतो आणि पणी मोकळे होत राहते…..
आर.डी. उर्फ पंचमदाचे वेड लावणारे संगीत, गुलझारचे जीवघेणे शब्द आणि आरती मुखर्जीचा थेट काळजाला हात घालणारा आर्त, कातर स्वर. मोजक्या शब्दात नेमकेपणाने बरेच काही सांगून जाणे हा गुलझारसाहेबांचा हातखंडा आहे. अगदी सहज, साध्या शब्दात श्रोत्याला पाझर फोड़णे हे गुलझारमियांचे वैशिष्ठ्य आहे. त्यात आरती मुखर्जी यांनी या गाण्याला असे काही सुर लावले आहेत की जणुकाही गाणे त्यांच्यासाठी म्हणूनच लिहिले गेले असावे. या गाण्याने आरती मुखर्जी यांना १९८४ सालचा ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा ‘ फिल्मफेयर पुरस्कार मिळवून दिला. याच चित्रपटासाठी गुलझारसाहेबांना सर्वश्रेष्ठ गीतकार, नसीरला सर्वश्रेष्ठ अभिनेता आणि पंचमदांना सर्वश्रेष्ठ संगीतकार असे मानाचे फिल्मफेयर पुरस्कार सुद्धा मिळवून दिले. आता मासुममधील बालकलाकार सुद्धा (उर्मिला मातोंडकर आणि जुगल हंसराज) हळूहळू तारुण्याच्या पल्याड जावून वार्धक्याकड़े झुकताहेत. पण हे आणि मासुमची एकुणातच सगळी गाणी अजुनही तशीच तरुण आहेत आणि कायम त्यांची गोड़ी संगीतरसिकांना मोहिनी घालत राहील.
विशाल कुलकर्णी
पनवेल, ०९९६७६६४९१९
Bhikan Jain
एप्रिल 3, 2019 at 10:06 सकाळी
खूप छान लिहिलंय विशाल ! हा सिनेमा आम्ही २५-३० वर्षांपूर्वी पाहिला होता;
काही भाग तर मी विसरूनही गेलो होतो – पण तुझा लांबलचक blog वाचून सगळं
डोळ्यांसमोर पुन्हा एकदा उभं राहिलं ! तुझ्या लेखणीत खरोखर एक जादू आहे हेच
खरं ! – 👌👌👌
धन्यवाद – 🙏
You have made my Day !!! – 💐💐💐
On Wed 3 Apr, 2019, 7:36 AM ” ऐसी अक्षरे मेळवीन !”, wrote:
> अस्सल सोलापुरी posted: “गुलजारसाहेबांचं नाव आधीही ऐकलं होतं. पण मुळातच राज
> कपुर आवडता असल्याने आम्हाला शैलेंद्रचं वेड. तसे थोड्या फार प्रमाणात मजरुह,
> साहिरही आवडायचे. थोड्याफार प्रमाणात एवढ्यासाठी की त्यावेळी गाणं आवडायचं, पण
> ते कुणी लिहीलय हे शोधण्याकडे फारसा कल नसायचा. आमच्यास”
>
अमित
एप्रिल 3, 2019 at 1:28 pm
अतिशय सुंदर लिहलंय. गाण्यातला प्रसंग तर जसाच्या तसा अगदी त्यातल्या भावानांसाहित डोळ्यांसमोर उभा राहिला, हि तुमच्या लेखनाची ताकद आहे.
shubhada
एप्रिल 3, 2019 at 2:51 pm
apratim.
shabdach natit vyakta vhayayla
dolyapudhe parat picture ubhe
अस्सल सोलापुरी
एप्रिल 11, 2019 at 7:40 सकाळी
मनःपूर्वक आभार 💐
अमित गुहागरकर
एप्रिल 10, 2019 at 1:27 pm
कसलं अचूक पकडलय. गाण्यातील प्रसंग त्यातल्या भावानांसहित डोळ्यांपुढे उभं राहिलं, हि ताकद आपल्या लिखाणाचीच. येरा-गबाळाचे काम नाही हे. दंडवत गुरुजी !!
अस्सल सोलापुरी
एप्रिल 11, 2019 at 7:40 सकाळी
धन्यवाद बंधु 🙏