‘मिन्सारा कनवू’
थांबा, थांबा लगेच असे चित्र-विचित्र चेहरे करू नका. हे आफ्रिकेतल्या कुठल्या प्राण्याचे किंवा टांझानीयामधल्या कुठल्या तरुणीचे नाव नाहीये. अगदी शत प्रतिशत भारतीय नाव आहे हे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या एक तमिळ चित्रपटाचे हे नाव आहे. आता तुम्ही म्हणाल , हिंदी-मराठी गाण्यावर लिहीता लिहीता हा एकदम तमिळवर कुठे घसरला? तर तमिळ चित्रपट आणि त्यांची गाणीही मला अतिशय आवडतात. ( तिकडच्या अभिनेत्री जरा जास्तच) पण विषय तो नाहीये, आजही मी एका हिंदी गाण्यावरच बोलणार आहे. मग या ‘मिन्सारा कनवू’चा प्रपंच कशासाठी? तर हाच चित्रपट , त्याच वर्षी आपल्या बॉलीवुडमध्ये हिन्दीत सुद्धा प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे नाव होते ‘सपने’.
ए. आर. रहमानचे सुश्राव्य संगीत लाभलेल्या या चित्रपटासाठी सिद्धहस्त गीतकार जावेद अख्तर यांनी गीते लिहिली होती. ए. आर. रहमान आणि दाक्षिणात्य संगीत म्हटले की सर्वात प्रथम डोक्यात येतो तो एखाद्या पांगळ्या व्यक्तीलाही थिरकायला भाग पाडेल असा नृत्याचा ठेका आणि ऐकताक्षणी जणुकाही दुसऱ्या जगात नेणारे मोहक, मादक संगीत. दाक्षिणात्य चित्रपट संगीत म्हटले की आठवतो तो तिथल्या कलाकारांच्या अंगात भिनलेला संगीताचा, विशेषत: नृत्याचा कैफ. अगदी बाळकृष्ण, चिरंजीवी यांच्यासारखे तुलनात्मक दृष्टया स्थुल म्हणता येतील असे कलाकार सुद्धा नृत्य म्हणले की बेभान होवून थिरकताना दिसतात. इथे सपने मध्ये तर साक्षात प्रभुदेवा होता. ज्याच्या शरीरात हाडे आहेत की नाही अशी शंका यावी असा नृत्याचा बादशाह प्रभुदेवा. जोडीला बॉलीवुडची बबली गर्ल काजोल आणि अभिनयाचा ताज म्हणता येईल असा देखणा अरविंद स्वामी. एक हलकी-फुलकी प्रेमाचा त्रिकोण असलेली प्रेमकथा. चित्रपटाची स्टोरी हवी असेल तर कृपया गुगलबाबाला किंवा विकीकाकाला विचारा. मी बोलणार आहे या चित्रपटातील काजोलवर चित्रित झालेल्या आणि हेमा सरदेसाईने, मलेशिया वासुदेवन यांच्यासोबत गायलेल्या एका सुंदर गाण्याबद्दल !
आवारा भंवरे जो हौले हौले गाए
फूलों के तन पे हवायें सरसराए
या गाण्यातली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे (अगदी चित्रपटातसुद्धा) हे एक उस्फूर्त गाणे आहे. त्याला आधार म्हणून कुठलीही घटना, कथानक नाहीये चित्रपटात. उगीचच घुसडल्यासारखे असूनही तसे अजिबात न वाटता चित्रपटाशी एकरूप होवुन गेलेले गाणे आहे हे. हे गाणे म्हणजे आनंदाचा उस्फूर्त आणि मनमोहक आविष्कार आहे. एका स्कुलमध्ये शिक्षिका, वर्गातल्या विद्यार्थिनीना निसर्गाचे महत्व, त्याची जादू समजावून सांगत असताना आनंदविभोर झालेली एक विद्यार्थिनी न राहवून उठते आणि सरळ गायला , नाचायला सुरुवात करते. मग तिच्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा हरवून जातात आणि सुरु होतो आनंदसोहळा.
निसर्गाच्या नाना कळा, नाना रंग , विविध रूपे. निसर्ग जेव्हा आपल्याच लहरीत, स्वतःच्याच तालावर डोलायला लागतो ना, तेव्हा त्याच्या लीला , त्याची रूपे पाहण्यासारखी असतात. त्यातही त्याचा मुड आनंदी असेल तर मग सगळे विश्वच सुंदर होऊन जाते. मग अगदी एखाद्या शुष्क, पर्णहीन वृक्षाला सुद्धा एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते ! आमच्या शांताबाई (शेळके) म्हणतात…
पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ
खरेतर समस्त निसर्गातच इतके संगीत ओतप्रोत भरलेले आहे की इतर कुठल्या मानवनिर्मित संगीतसाधनांची, वाद्यांची गरजच पडू नये. सतत कानावर येणारा भुंग्याचा गुंजारव, या फुलावरुन त्या फुलाकडे जाताना त्यांच्या पंखांची हळुवार आवाजातली गुणगुण किती श्रवणीय असते. कधी शांत, कोमलपणे तर कधी बेभान होत वाहणाऱ्या समीराची कानात साठवून ठेवावीशी वाटणारी सळसळ नेहमीच मनाला मोहवून टाकते.
कोयल की कुहू कुहू
पपिहे की पिहू पिहू
जंगल में झिंगुर की झाये झाये
कोकिळेची ‘कुहू कुहू साद, राव्याचा ‘पीहू पीहू ’ नाद आणि पाऊसकिडय़ांचा अनवरतपणे कानावर येणारा ध्वनी, यांनी सगळ्या निसर्गाचेच संगीत बनवले आहे. लचकत, मुरडत किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटांचे गाणे ऐकलेय कधी?
नदिया में लहरे आए
बलखाये छलकी जाए
भीगे होंठो से वो गुनगुनाए
गाता हैं साहील गाता हैं बहता पानी
गाता हैं ये दिल सुन सा रे गा मा पा धा नी सा रे
त्या गायला लागल्या की तो किनाराही त्यांना आवेगाने साथ देतो . त्या प्रवाही लाटा व स्तब्ध किनारा यांच्या सोबतीने मग कविमनही मुक्त कंठाने गाऊ लागते. ती सरगम हळूहळू सगळ्या आसमंतात झिरपायला लागते.
आणि हे सगळे कमी असते की काय म्हणून रात्रीच्या नीरव शांततेच्या संगीतात कित्येक मानवनिर्मित गोष्टीदेखील भर घालत असतात बरं.
रात जो आए तो सन्नाटा छाए तो
टिक टिक करे घडी सुनो
रात्रीच्या नीरव शांततेत घड्याळाची अविरत टिकटिक, कुठेतरी दूर एखाद्या पुलावरुन जाणाऱ्या आगगाडीची धडधड. रातकिड्यांची किरकिर या सगळ्यात एक प्रकारचे दैवी संगीत भरलेले आहे. कवि म्हणतो की हे मानवी मनाचे संगीत आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची, त्याचे गाणे करण्याची मानवी मनाची ही खूबी जागवा, तुमच्या आयुष्याचे संगीत होवू द्या.
दूर कही गुजरे रेल किसी पुल से
गूंजे धडाधडी सुनो
संगीत हैं ये, संगीत हैं..
मन का संगीत सुनो
एखादी आई अगदी हलक्या स्वरांत आपल्या बाळाला अंगाई गावून जोजवते तेव्हा त्यात दडलेले संगीत तृप्त करून जाते. त्याचा आस्वाद घेतलाय कधी?
हे गाणे म्हणजे मुक्त आनंदाचा उन्मुक्त अविष्कार आहे. या सगळ्या विद्यार्थिनी आपले सगळे दुःख, समस्या विसरुन काही क्षणासाठी का होईना आनंदविभोर होवुन मनसोक्त नाचतात. हे गाणे बघताना अजुन एक गोष्ट लक्षात येते. रादर ही दक्षीणेकडच्या चित्रपटांची खूबी आहे म्हटले तरी चालेल. ती म्हणजे या नृत्याला कुठल्याही चौकटी नाहीयेत. बॉलीवुडमधील कवायती नृत्य नाहीये हे. एखाददूसरी कॉमन स्टेप सोडली तर बहुतेक मूली आपल्याला हवे तसे नाचताना, बागडताना दिसतात. दक्षीणेकड़े बऱ्याचश्या भागात अजूनही स्त्रीला पुरुषाइतकाच रादर थोड़ा जास्तच मान आहे, आदर आहे. मोकळीक आहे. तिकडे स्त्रीपुरुषाचे नाते सुद्धा उत्तरेपेक्षा जास्त मोकळे आणि सहज आहे. तो मोकळेपणा, ते स्वातंत्र्य या गाण्यात स्पष्टपणे जाणवत राहते.
भीगे परिंदे जो, खुद को सुखाने को
पर फडफडाते हैं सुनो
गाये भी बैल भी, गले में पडी घंटी
कैसे बजाते हैं सुनो
भिजलेले पंख सुकवण्यासाठी जेव्हा पक्षी आपल्या पंखांची फडफड़ करतात तेव्हा त्याने निर्माण होणारा लयबद्ध नाद असो वा गाई-बैलांच्या गळ्यातील घंटीची नाजुक, सुरेल किणकीण असो या सर्वातच निसर्गाचे नादमधुर संगीत सामावलेले आहे. हे सगळे संगीत अनुभवायला शिकायला हवे. आपण आजकाल कानात हेडफोन अडकवतो आणि आपल्या संगीतवेडाचा दिखावा करत फिरतो. पण खरतर ती स्वत:चीच फसवणूक करत असतो आपण. या निसर्गात केवढंतरी आनंदमयी संगीत भरून राहिलेले आहे. अगदी गवताची सळसळ, झाडावरुन ओघळलेल्या शुष्क पानाचा गंभीर नाद, झरे, नदी, नाल्यांच्या वाहत्या पाण्याचे मंजुळ नाद. अगदी मनापासून सांगायचे झाले तर रात्रीच्या नीरव शांततेचाही एक स्वतःचा असा नाद असतो. तो ऐकायला अनुभवायला शिकले पाहीजे. संगीत सर्वत्र आहे पण ते अनुभवण्यासाठी संगीत आपल्या गात्रा-गात्रात रुजवावे लागते. स्वतःला विसरुन त्या निसर्गाशी एकरूप व्हावे लागते. कानाला हेडफोन लावून नव्हे तर कानाचे सगळे पडदे उघडून हे संगीत ऐकायला हवे.
पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’मधल्या लच्छीची गोष्ट आठवते का? मोर बघायचा असेल तर आपणच मोर व्हावे लागते. तारुण्यात प्रचंड ऊर्जा असते. ती जपता, टिकवता आली की जगण्याचे संगीत होवुन जाते आणि मग सात स्वर ‘सा रे ग म प ध नि सा ‘ करत आपल्याचे आयुष्यात एकरूप होवुन जातात. मनमोराचा पिसारा फुलतो आणि आपणच मोर होतो.
धन्यवाद.
विशाल कुलकर्णी
भ्रमणध्वनि : ०९९६७६६४९१९